दिनांक:
> मुख्यपान
 
ग्लोबल कोकण महोत्सव 2011 (24 ते 27 फेब्रुवारी 2011)
> मुख्यपान
  पान2
दिनांक: 18-02-2011

ग्लोबल कोकण महोत्सव हा कोकणातील निसर्गाची व मानव संपदेची समृध्दी जगासमोर नेणारा पहिला आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे. पहिल्यांदाच कोकणची समृध्दी एकत्रितपणे दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. कोकणचा निसर्ग, शेती, फलोद्यान, समुद्र, बंदरे, मत्स्योद्योग, पायाभूत सुविधा, रियल इस्टेट, संस्कृती, शिक्षण, लोककला हे सर्वकाही भव्य प्रमाणात आधुनिक पध्दतीने, देखणेपणाने जगासमोर आणण्याचा प्रयास कोकणभूमी प्रतिष्ठान करीत आहे. यात कोकणातील अनेक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. सर्व कर्तृत्ववान कोकणवासियांना एकत्र आणून पुढील 15-20 वर्षांत समृध्द कोकण निर्माण करण्याकरीता कृती आराखडा निश्चित करावा या अपेक्षेने हा महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे. दि. 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे हा उपक्रम आयोजित केला जाईल. कोकणातील कर्तृत्ववान व्यक्ती, बँका व इतर संस्था, अनेक उद्योजक, सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, विविध पक्षांचे कोकणातील नेते यांच्याबरोबरच महाराष्ट्र शासनाचे विशेष सहकार्य या महोत्सवाला अपेक्षित आहे. हा महोत्सव शेकडो मान्यवर व्यक्ती व संस्था यांच्या मदतीने होत असून प्रायत: कोकणातील कोकणभूमी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आकारास येत आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री. द.म. सुकथनकर, माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य हे असून श्री. संजय यादवराव हे संस्थेचे महासचिव आहेत.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 4 लाख चौरस फुटाच्या जागेत ग्लोबल कोकण महोत्सवाचे सेट आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्येष्ठ सिने कलादिग्दर्शक श्री. नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होत आहेत. ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, साहित्य, उद्योग, व्यापार, पर्यटन, सहकारी- सरकारी उपक्रम व लोककला क्षेत्रातील कोकणातील हजारो मान्यवर एकाच व्यासपीठावर ग्लोबल कोकण महोत्सवात आपल्याला दिसतील, अशी अपेक्षा आहे. पक्षीय मतभेदाची पादत्राणे बाजूला सारुन अशा प्रकारे कोकणातील सर्व मान्यवरांनी एकत्र येण्याचा खऱ्या अर्थाने हा पहिला-वहिला उपक्रम असेल.
या उपक्रमाच्या माध्यमातून समृध्द, समर्थ व सुजाण कोकणच्या विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोकणच्या निसर्गामध्ये व माणसांमध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे. परंतु क्षमतेच्या तुलनेने कोकणचा विकास झाला नाही. कोकणातील मानसिकता बदलावी, सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत करावी, कोकणात विकासाचे प्रकल्प उभारावेत, यातून रोजगार निर्मिती व्हावी याकरीता कोकणभूमी प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था एक सुनियोजित अभियान करीत आहे. कोकणातील हापूस आंबा, फलोद्यान, निसर्ग, पर्यटन उद्योग, वनौषधी, सागरी संपत्ती, मत्स्योद्योग, बंदरे या साधन संपत्तीचा नीट उपयोग करुन, विकासाचे हजारो प्रकल्प कोकणात उभे व्हावेत, असा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र शासन व कोकणवासिय यांच्यामध्ये समन्वय साधून विकासाचे लहानमोठे हजारो प्रकल्प कोकणात उभे व्हावेत, असा आमचा प्रयत्न आहे. मागील 15-20 वर्षांत ज्याप्रमाणे योजनाबध्द रितीने केरळ राज्याने आपल्या सृष्टीसौंदर्याची जगभर प्रसिध्दी केली, तशा प्रकारे कोकणाची प्रसिध्दी जगभर व्हावी, देशभरातून व जगभरातून लाखो पर्यटक कोकणात यावेत व यातून गावागावात पर्यटनाचे प्रकल्प उभे रहावेत याची सुरुवात म्हणून 'ग्लोबल कोकण' हा भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करीत आहोत. कोकणचा निसर्ग, पर्यटनस्थळे, फलोद्यान, शेती, वनौषधी, उद्योग, संस्कृती, लोककला यांना जागतिक व्यासपीठ मिळावे हा मुख्य उद्देश आहे. कोकणाबद्दल जगात आकर्षण निर्माण व्हावे, कोकणच्या सौंदर्याची ख्याती-किर्ती जगात वाढावी या उद्देशाने साकार होणाऱ्या या महोत्सवाचे नाव 'ग्लोबल कोकण' असे हेतूत: दिले गेले आहे आणि म्हणूनच महोत्सवाच्या विविध दालनांतून निसर्गभूमी सिंधुदुर्ग, रत्नभूमी रत्नागिरी, वीरभूमी रायगड, उद्योगभूमी ठाणे यांच्या क्षमतांचे प्रकटन केले जाणार आहे.

सारस्वत बँक सहकार क्षेत्रातील देशातील अग्रगण्य बँक असून, तिचा जन्म हा तळकोकणात झाला असल्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या महोत्सवात प्रामुख्याने सहभागी झाली आहे. महोत्सवाच्या चार दिवसांत होणारे सेमिनार हे कोकणातील मुलभूत व सर्वस्पर्शी विकासाचा कृतीशील विचार पुढे आणतील. या महोत्सवातील सर्व मार्गदर्शनाच्या आधारावर व महोत्सवानंतर तज्ज्ञांचा सहभाग घेऊन सारस्वत बँक कोकणविकासाचे मॉडेल विकसित करीत आहे. विशेषत: कोकणात येणाऱ्या विविध आकाराच्या उद्योजकांसाठी एक विशेष आर्थिक योजना कार्यान्वित केली जाणार आहे. यात प्रामुख्याने अतिशय सोप्या पध्दतीने कर्ज देणाऱ्या तरतुदीचा विचार होत आहे. मोठे उद्योग उभारण्यापासून महिला अल्पबचतगटांना वित्तपुरवठा करुन कोकणची आर्थिक क्षमता कोकणातील सर्व सहकारी बँकांची मदत घेऊन वाढविण्याचा सारस्वत बँकेचा मानस आहे. यासाठी कोकण विभागातील बँका, त्यांच्या संघटना व पदाधिकारी पुढे सहभागी होणार आहेत. केवळ वित्तपुरवठयाअभावी कोकणातील एकही चांगली योजना अडचणीत येऊ नये असा या प्रयोगामागे सारस्वत बँकेचा प्रयत्न राहील. कोकणातील अनेक सहकारी बँका एकत्रित येऊन हा वित्तपुरवठा करणार असल्याने सामुहिक प्रयत्नांना मोठा आधार मिळेल व कोकणचे अर्थकारण सुधारेल.
कोकण विकासाची ही आधुनिक चळवळ अनेकांना पाठबळ देणार आहे. आपणही आदरणीय श्री. डी.बी. म्हैसकर किंवा मा.श्री. मनोज तिरोडकर यांच्यासारखे उद्योजक होऊ शकतो. वैयक्तिक, सामुहिक पराक्रमाने अभ्या कोकणचे प्रारब्ध आपण बदलू शकतो, हा आत्मविश्वास घेऊन, कोकणातील सहकाराला एकत्र गुंफून त्यातून तरुण होतकरु उद्योजकांना पाठबळ देता येईल. ठाणे ते सिंधुदुर्ग येथील यशस्वी व्यावसायिक, कृतीशील तज्ज्ञ व नवनवे प्रयोग करणाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून वनवासी व ग्रामीण भागाच्या गरजा ओळखून स्वयंरोजगाराचे जाळे विणण्याचे काम सुरु झाले आहे. जे जे कोकणचे असेल ते सर्वोत्तम अशी मानसिकता ग्लोबल कोकणमधून निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. गुजरात राज्यातील आणंदमध्ये डॉ. वर्गिस करियान यांनी शुभ्रक्रांतीचा जो जागतिक दर्जाचा प्रयोग केला, त्यापासून प्रेरणा घेऊन कोकण शक्तिशाली करण्यासाठी ग्लोबल कोकण ही सुरुवात आहे. 'डिस्कव्हर कोकण- उत्तुंग ते अथांग' हे महोत्सवाचे ब्रिदवाक्य आहे.
ग्लोबल कोकण महोत्सवानंतर कोकणातील विकासाकरीता तज्ज्ञांचे गट नियुक्त केले जातील. हे गट कोकणातील प्रत्येक तालुक्यात अभ्यास दौरा करतील. या तज्ज्ञांची राज्यातील सर्व विद्यापीठांत चर्चासत्रे आयोजित केली जातील. या चर्चासत्रातून निघणाऱ्या निकषांच्या आधारे पुढील 20 वर्षांतील कोकण व्हिजन निश्चित केली जाईल. सरकारी- पब्लिक व खाजगी सहभागातून विकासकामांना गती देता येईल.
विकासाच्या योजना कार्यान्वित करताना स्थानिकांच्या मुलभूत गरजा लक्षात घेणे महत्वाचे आहे. विकास प्रक्रियेत सर्वांना सहभागी करुन घेणे गरजेचे आहे. आपल्या देशात व विशेषत: राज्यात स्थानिकांनी असे विकासाचे छोटे छोटे प्रयोग करुन आपापला जीवनस्तर उंचावल्याची अनेक उदाहरणे आहेत. स्वातंत्र्यानंतर शासन यंत्रणेकडून व विविध स्वयंसेवी संस्थांद्वारा विकासाची निरनिराळी कामे सुरु झाली. या कामातून मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न झाला. राज्यात सहकार चळवळीसह विविध माध्यमातून ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी प्रयत्न झाले. या प्रयत्नातून राज्यात काही चांगले बदलही घडले.
प्रत्येक पिढी भविष्याचा विचार करुन कार्यरत आहे. नव्या पिढीला अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा संस्कार आजची तरुणाईही समर्थपणे सांभाळत आहे. उद्यमशील, स्वप्नाळू व कष्टाळू तरुणाई नवनव्या साहसाचे अनेक प्रयत्न करीत आहे. या साहसातून विकासाची नवी दारे उघडली जात आहेत. या साहसाला प्रतिसाद मिळाल्यावर कोकण विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त होणार आहे.
ग्लोबल कोकण महोत्सव हे असेच अद्भुत नाविन्यपूर्ण व सृजनशील साहस आहे. या साहसामागे एक निश्चित विचार आहे. विचारामागे कोकण विकासाचे व्यावहारिक तत्व आहे. निसर्गसुंदर कोकण जगासमोर मांडण्याचा ध्यास कोकणातील काही चळवळयांनी घेतला आहे. यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भव्य-दिव्य ग्लोबल कोकण महोत्सव साजरा होणार आहे. कोकणचा विकास कोकणातील सर्वांनी मिळून सुनियोजितपणे करण्याचा हा आगळावेगळा प्रयत्न आहे. बंदरे, फळप्रकिया, शेती, मत्स्योद्योग, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, विविध प्रकारचे उद्योग आदी विकासाच्या मुलभूत मुद्यांना नेमकी दिशा मिळावी तसेच कोकणातील निसर्गसंपदा, पर्यावरण यांचे संवर्धन करुन पर्यटन व्यवसायाला गती मिळावी, यादृष्टीने ग्लोबल कोकण महोत्सवाची आखणी केली आहे. हा महोत्सव देशाचा व जगाचा कोकणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास सहकार्य करेल. दिनांक 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या पहिल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामुळे कोकणातील पर्यटन व्यवसायाला व विविध उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल.
महोत्सवाचा हा अत्यंत अभिनव व वैशिष्टयपूर्ण प्रयोग केवळ कोकण हिताचा नव्हे तर राज्याच्या हिताचा ठरेल आणि यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावेल. राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात समृध्द कोकणचा संकल्प यातूनच मार्गी लागेल. भारत महासत्ता होताना कोकणची सर्वांगीण प्रगती होणे अगत्याचे आहे. साने गुरुजींच्या स्वप्नातील भारत बलशाली होण्यासाठी, विश्वात शोभून राहण्यासाठी कोकणच्याही सर्वांगीण प्रगतीची गरज आहे. त्यासाठी कोकणही श्रीमंत झाला पाहिजे. सदर महोत्सव हा कोकणच्या समृध्दीचा पायाभरणी समारंभ व शुभारंभ आहे. कोकणच्या विकासाच्या ध्यासाने झपाटलेले हजारो हात या महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. शेकडो तरुण कोकण विकासाचे सामूहिक गान गाण्यासाठी सज्ज झाले आहेत. एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.
या महोत्सवानंतर कोकणातील हजारो तरुण पुढे सरसावणार आहेत. कोकणचे भविष्य घडविणाऱ्या या महोत्सवाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी आपण सर्व मान्यवरांचे आशिर्वाद व सहकार्य आम्हाला मिळेल व स्वत:हून सहकुटुंब मित्रपरिवारासह या सोहळयात चारही दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत आपण सामील व्हाल, अशी प्रामाणिक विनंती व अपेक्षा मी व्यक्त करतो.

श्री. द.म. सुकथनकर, माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन आणि अध्यक्ष, ग्लोबल कोकण
श्री. संजय यादवराव, कार्याध्यक्ष, ग्लोबल कोकण
श्री. एकनाथ के. ठाकूर, अध्यक्ष, सारस्वत बँक आणि स्वागताध्यक्ष, ग्लोबल कोकण
श्री. नितीन देसाई, कला दिग्दर्शक, ग्लोबल कोकण

 

 
 
  पान2
Go To Top Of Page