दिनांक:
> मुख्यपान
 
पावसाच्या राज्यासाठी.... !!
- डॉ. स्वप्नजा आ. मोहिते.
> मुख्यपान
  पान 1
दिनांक: 19-07-2010
पाऊस........लहानांपासून मोठयांनाही वेडं करणारा उन्हाळयाचा ऋतू सुरू झाल्यापासून आपण पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पहात असतो, नाही का? मे महिना संपायला आला की आपण पाऊस कधी येणार याची चर्चा करू लागतो. मग तो वेळेवर येणार का? या वर्षीचा पावसाळा लांबणार का? एक वा अनेक प्रश्नांचे भुंगे प्रत्येकाचच मन कुरतडू लागतात. असा वाट पहायला लावणारा पाऊस मग अचानक एक दिवशी अगदी काहूर लावल्यागत येतो.
ओथंबून आले मेघ
सागरावर सावळी सावली,
सर्द गारवा दाटलेला
चाहूल पावसाची लागलेली !
पाण्यानं जडभार झालेले सावळे मेघ डोक्यावरून सरकू लागतात. दूरवरून कुठून तकरी मातीचा एक धूंद गंध जाणवतो. खर तर पाऊस पडायला सुरूवातही झालेली नसते. पण त्या गंधाची आठवण मनात जागी होते आणि गच्च गर्दीतसुध्दा मन पावसाचा वेध घेत भरकटू लागत, मग भोवतालची माणसांची, गाडयांची गर्दी जाणवत नाही की रस्त्यातून अचानक उठलेली धुळीची वावटळ दिसत नाही.
दिसते केवळ पावसाची अंर्तबाहय भिजवणारी सर ! एरवी घरी जाण्याची घाई करणारी पावलंही मग नकळत रेंगाळू लागतात. मनातलं लहान मुल नकळत जागं होत. आता मस्त भिजायच ! कोणी हसलं तर? काय फरक पडतो त्यान ?ं आपणच आपली समजूत घालतो आणि नकळत एखाद गाण ओठावर येतं. अगदीच दुसरं गाण नाही आठवल तरी लहानपणी पावसाला पैसा ेदेण्याच आमिष दाखवणार बडबडगीत तर मनात ठाण मांडून असतच. ये रे ये रे पावसा........
आता ये रे बाबा ! किती अंत पहातोस ! मन आता अगदी घायकुतीला आलेलं असत. अचानक पावसाचा एक थेंब नाकावर पडतो. मग गालावर. मनातल अवखळ मुल म्हणत ........ जीभेवर झेलू या का पावसाला ? छे ! काहीतरीच काय ? आपण चाचपून आजूबाजूला पहातो. कोणी पाहिलं तर ? पण छे ! लक्ष कोणाचच नसत. सगळेच आपल्या मनाला समजावत असतात. आपल्याच नकळत आपण पावसाचा एक थेंब जीभेवर झेलतो आणि एक नखशिखांत गारवा मनापर्यंत झिरपत जातो. एव्हाना पावसानं चांगलाच जोर पकडलेला असतो. रस्त्यावर पावसाचा प्रत्येक थेंब मोरपिसाचे ठसे उमटवत झरत असतो. हळूहळू पाऊस सगळयांनाच आपल्या कवेत घेतो. कोणी छत्री नाही म्हणून, कोणी भिजायचच होत म्हणून, कोणी मित्र-मैत्रिणी भिजताहेत म्हणून ......... प्रत्येकजण आपापला बहाणा सांभाळत, भिजतच असतो, एव्हाना रस्त्यातून चहाच्या रंगाचे ओहोळ कुठल्यातरी अनामिक ओढीन वाहायला लागलेले असतात.
झाडातून झर झर झरणारा
मनात माझ्या उरणारा
पाखरांच्या पंखात भिजणारा
पाऊस असा झिरमिरणारा !
मग अस गच्च भिजलं की पावलांना ओढ लागते सागर किनारा गाठण्याची, सागराला तर केव्हाच उधाण आलेलं. पुळणीवर येण्यासाठी लाटांची गडबड उडालेली. पावसाचे थेंब पुळणीवर पडण्याआधी पोहोचायचय आम्हाला....... वाळूचा प्रत्येक कण भिजवायचायं पुळणीवर विखुरलेल्या शंख-शिंपल्यांना जागवायचयं !
असा नवसाचा पाऊस
आला आला गं सयांनो,
त्याच्या गं स्वागताला
घाला नक्षी-रांगोळी सयांनो !
पावसाचा प्रत्येक थेंब झेलायचाय, फ ेंन-फुलांची महिरप सजवत त्याच स्वागत नको करायला ? लाटा अधिकच उधाणतात. लाटांच्या तुषारांचा खारटपणा ओठांवर उतरतो व उतरतो तोच पावसाचे थेंब आपलं अस्तित्व ओठांवर उमटवतात आपल्या असा पाठशिवणीचा खेळ खेळलात कधी ?
पाऊस आता एका लयीत बरसत असतो. डोक्यावरचे काळे कबरे ढग आता अगदी गच्च दाटून आलेले असतात. पसरत जाणा-या काळोखाला एक सर्द ओलेता गंध असतो, उरल्या सुरल्या उजेडात झाडाची पानं तृप्त हिरवेपणा पांघरूण नवी झाल्यागत उजळतात. उन्हाळाभर अंगावर साचलेली धूळ पावसान किती सहजपणे पुसून टाकली नं ? झाडाच पान पान स्वत:लाच पायतळी साचलेल्या पाण्याच्या एैन्यात न्याहाळत बसत मग ! फांदयामधून गुडूप झालेली पाखरं उगीचच पंख फडफडवतात. त्यांच्या पंखातून उडणा-या थेंबानी झाड परत शहारतं आणि पाखरांना कुशीत घेऊन झोपून जात. आजवर लपलेल्या काजव्यांना आता मात्र जाग येते. पानांच्या आडून हिरवे-निळे इवलेसे दीप आता अलवारपणे उजळतात. या दिव्यांच्या मंद उजेडात झाड चांदण्यात न्हाऊन जातं. रातकिडयांच्या नादबध्द संगीतात तेव्हा बासरीचा सूर उमटत रहातो.पाऊस शांतपणे बरसत रहातो. पावसाचं गीत कौलांवर ताला सुरात रेंगाळत रहात तेव्हा पाऊस आल्याच समाधान तना-मनावर पांघरून, आपण अंधारात पाऊस शोधत रहातो.रस्त्यावरून वहात धावणारे ओहोळ आता डोंगर द-यांमधून उडया मारायला उत्सुक झालेले असतात.
पावसाच्या धारा,
असा सर्दावला वारा
हिरव्याशा रानवाटा, अन्
दूर खुणावता झरा !
 
उंच कडयांवर आवेगात झेपावते झरे पुकारत रहातात. सारीकडे गच्च हिरवाई आणि त्या हिरवाईला अधोरेखीत करणारे शुभ्र फेसाळते पाणी........ वाट फुटेल तिथून कोसळणारे ! खाली खडकांवर, कातळांवर आपटून, परत वर उसळणारे ! तुषारांच्या नक्षीतून इंद्रधनूच्या सप्तरंगात रंगवणारे ! एक अनामिक ओढ लावणारे ! आसपासचे सारे खडक तेव्हा शांत, हिरवळ पांघरून, संन्यस्त, कोणाला तरी सोबत घ्याव आणि या कोसळत्या पाण्याचा आवेग अनुभवत, हरवून जाव....... मनात तेव्हा काहीतरी नवच जागं होत. वरून कोसळता पाऊस असावा. सोबत धवधब्यांचा घनगंभीर षड्ज असावा. सभोवार एक अनामिक शांतता..... चराचराला व्यापून उरलेली आणि चिंब मनाची समाधी लागावी. प्रपात कोसळत असतो...... त्याच्याच मस्तीत एरवी शुष्क वाटणारे काळेकभिन्न खडक ही आता लडिवाळ, गोजिरे वाटतात. पाणी त्यांना कवेत घेत, कधी टपल्या मारत तर कधी धपाटे घालत, खोडया काढत धावत असत. एखाद्या अवखळ मुलागत, एखाद्या प्रचंड खडकाभोवती ते उगाचच रेंगाळत, भोवरे घालत फिरत, घोटाळत..... आणि मग कसलीशी ओढ लागल्यागत पळत सुटत. कुठेतरी पाणी अचानक डोहात उडी घेत, विसावतं थोडा वेळ. डोहातल्या चंदेरी मासोळया पाण्याच्या प्रवाहाबरोबर खेळतात मग लपाछपी, आपणही एखाद राज्य घ्यावं त्यांच्या या खेळात आणि gm s s B© s s gw Q>`m{ ss’ म्हणून ओरडावं लहान मुलागत, अंर्तबाहय भिजत, नाहीतर एखाद्या पाचूगत रंगलेल्या खडकावर बसून डोक्यावर झेलाव्यात धारा...... पावसाच्या आणि धबधब्याच्याही ! जलात मी ...... जलमय मी ! असा जप करत ! या साधनेत मग मी पणाचा नवाच साक्षात्कार होतो. पावसाचे थेंब, धबधब्याच्या तुषारांसोबत केसात हिरकण्या जडवत जातात. कोसळणा-या पाण्याची आवर्तन, मनावर गारूड करत जातात.
फेसाळत कोसळणा-या धारा
सोबत घ्याव्या कधीतरी .
आणि तन्मयतेन व्हाव एकरूप
पावसामध्येच,
पावसाशी, कधीतरी !
गेल्या सगळया ऋतूंचा शिणवटा दूर करण्यासाठी रानवाटा शोधाव्या ........ मस्त पावसाला बरोबर घ्यावं, सोबतीला उंच कडयांवरून कोसळणारे प्रपात असावेत. हिरवेपणाच्या असंख्य छटांनी नटलेली आणि टपटपणा-या थेंबाचे प्रकाशलोलक मिरवणारी झाडं, भुईतूनच उगवलेली रंगाची उधळण करणारी इवली इवली रानफुलं, पावसाच्या स्पर्शानं शहारलेली गवताची पाती आणि धुक्याची तलम ओढणी पांघरून बसलेला निसर्ग ....... पावसाच्या थेंबांच मस्त ओढ लावणार संगीत अलवारपणे झरत आहे. सावळया घनाआडून कुठले सूर पुकारत आहेत ? कसली ही बेहोषी ? बंद डोळयांआड कुठले रंग ? वळणावळणावर पावसासोबत भेटणारे हे झरे ...... हिरवी चुनरी पांघरून बसलेले हे डोंगर ...... सर्द गारवा ...... कधीचे खुणावताहेत. पावसाचं राज्य आलं आहे. भिजायला हवच नं ?
  पान 1
Go To Top Of Page