दिनांक:
> मुख्यपान
 
कोकणचे इंद्रधनुषी व्यक्तिमत्व - शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी
प्रसन्न रंगनाथ कांबळी
पत्ता- भागिरथी भुवन, 205 पहिला मजला, तेळी ओळी रत्नागिरी
फोन नं. कार्यालय 230518 निवास - 234001 मो. 9890628358
> मुख्यपान
  पान 1
दिनांक: 16-04-2010
एका माणसाच्या ठायी किती गुण असू शकतात ? एका वेळी तो किती प्रकारची कामे लिलया हाताळू शकतो ?... तीही आपली रोजची नोकरी प्रामाणिकपणे सांभाळून ! याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला एकदा प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनाच भेटावं लागेल ! या असामीच बोलणं, वागणं सारच त्यांच्या नावाप्रमाणे प्रसन्न ! तुमची त्यांची एकदाका भेट झाली की, तुम्हीही प्रसन्नच नव्हे तर 'प्रसन्नमय' होऊन जाल. एका वेळी अनेक गुणांचं इंद्रधनुष्य पेलणाऱ्या या प्रसन्न व्यक्तीमत्वातली जादू भेटणाऱ्या प्रत्येकाला भूरळ घातल्याशिवाय राहात नाही.
प्रसन्न कांबळींच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. शब्दकोडेकार म्हणून ते ख्यातनाम आहेतच. शिवाय क्रि्रकेटवरही त्यांनी लेखन केलेले आहे. विविध पशु आणि पक्षांचे आवाज ते हुबेहुब काढून दाखवितात. उकडीचे नक्षीदार मोदक ते असे काही अल्पावधीत बनवितात की. निष्णात सुगरीणी महिलाही अचंबित होऊन जातात. तसेच ते एक कुशल टिमकी वादक आहेत. सत्यनारायणाच्या महापूजेचा प्रसाद ते असा काही चविष्ट बनवितात की, त्यासाठी त्यांना ठिकठिकाणाहून बोलावणी येतात. त्यांच्यात दडलेला कूक एवढया पुरताच मर्यादित नाही. त्यांनी शिजवलेले मटण एकदा का खाल्ले की त्याची चव खवैय्यांच्या कायम जीभेवर रेंगाळत राहाते. त्यांचा असा एकही पैलू नाही की, ज्याची तोंड भरुन स्तुती झाली नाही.
भारतीय दूरदर्शननेही सह्याद्री वाहिनीवरुन 4 नोव्हेंबर 2000 रोजी त्यांच्या या विशेष कौशल्याची दखल घेतली. इ टीव्हीनेही त्यांच्या नक्षीदार सुबक उकडीचे मोदक अल्पावधीत बनविण्याच्या कृतीचे प्रात्यक्षिक सादर केले. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राने ही, शब्दकोडेकार, मोदककार, प्रसन्न कांबळी यांना सादर केले आहे. दैनिक 'सकाळ' या नामवंत दैनिकानेही त्यांच्या 'मधुरांगण' या उपक्रमामधून सांगली चिपळूण सारख्या शहरांमधून त्यांच्या मोदक बनविण्याची प्रात्यक्षिके महिलांना दाखविली. विविध संस्था आणि गावोगावी त्यांनी 160 प्रात्यक्षिके सादर केली आहे. त्यांच्या या कसबाने महिलाही थक्क होवून गेल्या
याबरोबरच त्यांचे सामाजिक कार्य देखील मोठे आहे. एका दुर्धर व्याधीग्रस्त तरुणाला नवजीवन प्राप्त करुन देण्यास प्रसन्न कांबळी यांनी मोलाचा हातभार लावला आहे. परोपकारी वृत्तीच्या स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या एका प्रसिध्द नाटकाचा प्रयोग रत्नागिरी येथे आयोजित करुन त्याला उपचारासाठी मोठी रक्कम मिळवून दिली होती. उपेक्षित कलावंतांचे रंगावली प्रदर्शनही आयोजित करुन स्वत: रंगावली काढतात. मुलगा आेंकार बी. ई. मेकॅनिकच्या शेवटच्या वर्षाला आहे. तर कन्या सुरभी 10वी मध्ये शिकत आहे. सर्वार्थाने देखणे असे हे कुटुंब आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ. मयूरा वहिनी या आदर्श गृहिणी आहेत. त्यांच्या सावली सारख्या साथीमुळेच प्रसन्न कांबळी कामांचा डोलारा सांभाळीत असतात, गेली 21 वर्षे ते प्रसन्न वधू वर सूचक केंद्र चालवित आहेत. पूर्णांशाने मोफत असे त्यांच्या या केंद्राचे कार्य चालू आहे. त्यांच्या या वधू वर सूचक केंद्रामुळेच अनेक मुलामुलींना योग्य साथीदार सापडून त्यांचे संसार सुखाने चालू आहेत. सुमारे 1850 त्यांनी मोफत लग्न जूळवून दिली आहेत. ते ऑफीसला गेले की, आल्यागेल्याचे स्वागत करणे, त्यांना स्थळांच्या फाईली दाखविणे. आदि कामे मयूरा वहिनी करतात. मुलांचाही त्यात सहभाग असतो.
त्यांनी काही तालुक्यांमध्ये भंडारी समाजाचे वधू-वर मेळावे भरविले. चार राज्यांचा वधू-वर मेळावा ही त्यांनी भरविला तो पहिला ठरला. ते रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघटनेचे संचालक आहेत. त्यांच्या या कामगिरीने प्रभावित होवून अखिल भारतीय भंडारी समाज संघटनेचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदीवडेकर यांनी 8 राज्यांच्या समाज मेळाव्यात त्यांचा विशेष गौरव केला. या मेळाव्याला केरळ, कर्नाटक, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आदी8 राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी एका पतसंस्थेची देखील स्थापना केली. तसे करण्याचे अनेक मान्यवरांचे प्रयत्न याआधी अयशस्वी झाले होते. समाजातील सर्वांना एकत्र आणण्याचे कठीण काम या प्रसन्न व्यक्तिमत्वाने करुन दाखविले आहे. विश्वनाथ नागरी पतसंस्थेचेही ते संचालक आहेत. सध्या ते त्यांच्या कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कर्मचारी संघटनेचे युनीट उपाध्यक्ष आहेत. खाते कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या कामात ते मदत करीत असतात. त्यांच्या जवळ जाणारा हा त्यांना नेहमी आपला माणूस वाटत असतो. त्याच्यासाठी कोणतेही काम करण्यास ते तयार असतात. समाजात वावरतानाही याच भावनेने ते वागत असल्याने त्यांचा सर्व थरातील लोकसंग्रह प्रचंड म्हणावा असाच आहे त्यांनी 42 वेळा रक्तदानही केलेले आहे. त्याबद्दल त्यांचा रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. त्यांचे अनेक सत्कार झाले. पुरस्कार बक्षीसे मिळाली आहेत.
ते जसे शब्दकोडे तयार करतात तसेच अचूकपणे अन्य वृत्तपत्रातील शब्दकोडी अचूक सोडवून बक्षीसेही मिळवितात. दैनिक पुण्यनगरी व दैनिक चौफेर यांची शब्दकोडी सोडवून त्यांनी मोटरसायकल बक्षीस म्हणून जिंकली आहे. मिक्सर,घडयाळ,बुट,शर्टपीस अन्य भेटवस्तू व रोख रक्कमही त्यांनी बक्षीसादाखल मिळविली आहेत. एका माणसाचा मेंदू नोकरी सांभाळून,संसार सांभाळूनही किती चौफे र चालतो. याचे नवलाईचे उदाहरण म्हणजेच प्रसन्न कांबळी ! रत्नागिरी येथे सिंधुदुर्ग मालवणी मित्र मंडळाची त्यांनंी मुहूर्तमेढ रोवली. या मंडळाचे ते संस्थापक - अध्यक्ष आहेत. रत्नदुर्ग रिक्षा संघटनेचे ते सल्लागार आहेत. विविध पदे ते आपल्या अंगच्या विविध पैलुंमुळे भुषवित आहेत.
आधी काम करायचे नंतरच बोलायचे हा त्यांचा स्वभाव आहे. झी मराठी चॅनेलच्या आदेश बांदेकर सादर करीत असलेल्या 'हफ्ता बंद ' या प्रश्नोत्तरे स्पर्धेचेही ते विजेते आहेत. 37 हजार 179 रुपये त्यांनी या प्रश्नोत्तरांच्या स्पर्धेत जिंकले, अशा प्रकारचा हा एकमेव शासकीय कर्मचारी असावा असे म्हटले जाते. त्यांनी आजवर तरूण भारत ,प्रहार, रत्नागिरी टाईम्स, भैरव टाइम्स, कोकण गर्जना, रत्नागिरी एक्सप्रेस, रत्नागिरी समाचार या दैनिकातून शब्दकोडी तयार केली आहेत. तसेच बलवंत, रविवार मित्र, भगवी सेना, रंगयात्री, शब्दशिल्प आदि साप्ताहिके नियतकालिकातून त्यांची शब्दकोडी प्रसिध्द झाली आहेत. एप्रिलच्या अक्षयतृतीयेच्या दरम्यान सातत्याने तयार केलेल्या शब्दकोडयांची संख्या 8हजार एवढी होणार आहे. यापेक्षा कमी शब्दकोडी प्रसिध्द झालेल्या महिलेची 'गिनिजबुक ऑफवर्ल्ड' मध्ये नाेंद झाली. मात्र प्रसन्न कांबळी यांच्या शब्दकोडयांची तेथे नोंद व्हायची आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
   
 
  पान 1
Go To Top Of Page