दिनांक:
> मुख्यपान
 
डॉ. वि. म. शिंदे यांचे 'स्वातंत्र्यवीर स्मरण पर्व' - स्मिता राजवाडे.
 
> मुख्यपान
  पान 1
दिनांक: 16-04-2010
इ. सन 1922 दत्तजयंतीला जन्मलेले डॉ. विनायक म. शिंदे 88 वर्षातही नियमित आहार-विहार, शिस्तबध्द जीवनक्रम, सामाजिक सहभाग, प्रसन्न मन यामुळे समाजप्रिय म्हणून प्रतिष्ठाप्राप्त गृहस्थ ! त्यांच्या 'आठवणीतली रत्नागिरी म्हणजे 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ' यानुसार 'सावरकरमय बाल्यकाळ, सावरकर प्रभावित तारुण्य, सहभोजनात सहभाग, निष्ठावंत कार्यकर्ता' म्हणावं लागेल. कारण डॉ. वि. म. चे वडील कै. डॉ. म. ग. शिंदे हे स्वातंत्र्यवीरांचे निस्सीम चाहते, निष्ठावंत अनुयायी. साहजिकच डॉ. वि. म. ना लहानपणापासून तात्याराव सावरकरांना जवळून बघणं, ऐकणं, अंगणात चर्चा याचा भाग्ययोग आलेला होता. त्यांच्या आठवणीतली रत्नागिरी ही इमारती, रस्ते, म्युन्सिपालटीचा स्वच्छ कारभार, भजनीमंडळाची सुरेल भजनं, व्याख्यानं, कथा, कीर्तन, काकडारत्या अशा निर्मळ पवित्र वातावरणातली. सर्वांशी कौटुंबिक स्नेह जपता येण्याइतकी परस्पर आत्मीयता. त्यांच्या स्वातंत्र्यवीरांच्या आठवणी समुद्रात लाटांवर लाटा याव्यात, मोजता येऊ नयेत, पण मन सागरातही आनंदलाटा उसळाव्यात अशा अगणित. !
'तात्याराव' हे रत्नागिरीतील सावरकर प्रेमींचे खाजगीतल संबोधन ! स्थानबध्दतेच्या काळात राजकीय सहभाग अशक्य ! पण सामाजिक सुधारणांचा सखोल विचार, कृतीची जोड, तळमळ यामुळे सावरकरांना सर्व स्वरातले, जातीतले अनुयायी मिळाले. वासुदेव हर्डीकर, कृष्णा शिंदे, पलूकाका जोशी, भागोजी शेठ कीर, अच्युत जोशी, अच्युत मलुष्टे, गजानन दामले, मो. वि. दामले, विष्णुपंत दामले, नानल वकील, अप्पासाहेब पटवर्धन, आयरे, कै. परुळेकर, डॉ. बा. ना. सावंत, मनोहर चव्हाण इत्यादी निष्ठावंत अनुयायी लाभले. डॉ. म. ग. शिंदे संपूर्ण कुटुंबच 'सावरकरमय' झालेलं.
तेव्हा आठ-दहा वयोगटातले डॉ. शिंदे केळीची पानं, पत्रावळी अशी सहभोजनाची तयारी करण्यात खारीचा वाटा उचलत. त्यांनी टिपलेलं सावरकरांच वैशिष्टय म्हणजे इंग्रजी शब्दांवर प्रभुत्व असूनही मराठी शब्दांचा सहज वापर दुकान-विकान, उपाहारगृह, प्रलोभन, श्रृंखला, पत्तन अभियंता इत्यादी. प्रयोग. त्यांची नजर समोरच्यांचा आरपार वेध घेत त्यांचा स्वभाव जाणून घेत, योग्य काम सोपवत.
आपल्याच समाजातली विषमता स्पृश्य-अस्पृश्य भेद, सवर्णाचं वेगळेपण, सोवळं, माणुसकीला न शोभणारं याची खंत वाटे. स्वत: तात्यारावांचे उच्च विचार आणि प्रत्यक्ष कृती यामुळे डॉ. शिंदे यांचे आजोळचे आजोबा कर्मठ असूनही अस्पृश्य गडयाला घरात ठेवण्याइतके उदारमतवादी झाले. आपले जावई (डॉ. म. ग. शिंदे) सावरकर प्रभावामुळे स्पर्शभेद मानत नाहीत म्हणून सासरे धोंडबाराव जाधव नाराज होते. आजोळी आलेल्या नातवंडांना ही बाहेर झोपवत. गोमूत्र शिंपडून 'शुध्द' करून घेत. परंतु प्रत्यक्ष भेटी, सावरकरांचे लेख, प्रत्यक्ष कार्य पाहून इतकं प्रभावित झाले की सोवळया-ओवळयाच्या कल्पनाच बदलल्या. अस्पृश्य गडयाला घरातल्याप्रमाणे वावरता येत असे. 'धर्माचं स्थान हृदय ! पोट नव्हे !' हे सावरकर तरुणांना तळमळीने सांगत. कर्मकांडांपेक्षा समाज मंदिरातील उपेक्षिताना ईश्वराच्या मूर्ती मानून ते 'पतितपावनाची' पूजा मांडीत. कै. भागोजीशेठ कीर यांनी
स्वत:साठी बांधलेलं भागेश्वर मंदिर पाहून तात्यारावांनी असंख्य अस्पृश्य, दलित, शोषित भक्तांच्या मनाला तोषविणारं 'पतितपावन मंदिर' बांधण्याची सूचना केली. त्यांनी लगेच मान्य करून येणारा खर्च उचलण्याची कृतीच केली आणि आजचं अखिल भारतातलं अस्पृश्यांना खुलं असणार पतितपावन मंदिर पहिलं क्रांतिकारक विचारांच 'उर्जाकेंद्र' झाले. स्वत: सावरकरांच्या देखरेखीखाली सहभोजनं झाली. 'मेळे, नाटकं, पोवाडे असे स्फुरणदायी कार्यक्रम झाले. वेदोक्त पुराणोक्त वाढ मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना उद्भवलाच ! पण तात्यारावांनी खंबीरपणे मोडून काढून वेदांपेक्षा श्रेष्ठ 'हिंदू धर्म की जय' मंत्र दिला. शेवटी मसुरेकर महाराजांच्या शिष्यांकडून वेदोक्तच 'मूर्तीस्थापना' कार्यक्रम झाला. दरवर्षी पंचपक्वान्न प्रसाद केला जायचा. सिंधूबंदी, रोटीबंदी, व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी अशा अमंगल श्रृंखला तोडून सावरकरांनी स्वतंत्र हिंदुस्थानातील आदर्श एकरूप समाजजीवनाची गुढी उभारली. प्रत्यक्ष कृती करणाऱ्या सावरकरांनी नारायण आयरे नामक कार्यकर्त्याच्या घरी भिडे गुरुजी, शिंदे इत्यादी सह भाजी भाकरी खाल्ली. संत एकनाथांचे खरेखुरे वारसदार सावरकरच !
'सार्वजनिक अर्थव्यवहार हा स्वच्छ, पारदर्शक असलाच पाहिजे' असा आग्राह धरणाऱ्या सावरकरांचे अनुयायी तसेच तयार झाले. 'बुध्दीला पटेल आणि जे समाज हिताचं असेल ते निर्भीडपणे सांगता यायला हवेच. कोणतेही समाजकार्य करताना ते करण्यात कमीपणा मानू नये !' असे प्रबोधन करणारे तात्याराव अनेक तरुणांच दैवतच होते. त्यांच चालण, बोलणं सगळच वेगळं. 'शिवरायांचे कैसे बोलणे, सलगी देणे', या समर्थवचनाप्रमाणेहोत. ते खादीची उंच टोपी (गांधी टोपी नव्हे) घालीत. हातगाडीवर देशी वस्तू, बांगडया, जाडी पिवळी साखर, कापड, साबण-विक्रीसाठी नेत, तेव्हा पाहणारे थक्क होत. स्त्रियांशी बोलताना 'मातोश्री', 'माई' अशी संबोधन वापरीत.
महात्मा गांधी सौ. कस्तुरबांसह सावरकरांना भेटून गेले. त्या वेळी 'आपले मार्ग भिन्न असले तरी अंतिम ध्येय एकच आहे.' सांगून निरोप घेतला रितीनुसार कस्तुरबांना सौ माईंनी हळदीकुंकू लावून खण देऊन साखर दिली.
ताजी वर्तमान पत्र वाचून झाल्यावर एका पुठ्ठयावर महत्त्वाची कात्रणं चिकटवून ठेवण्याचा त्यांना छंद होता. 'करू चला स्वदेशीच्या अंगीकाराला; स्वदेशी व्रत हे पुण्यव्रत हे इतुके तरी पाळा.'' हे गीत रत्नागिरीकरांना खुद्द तात्यारावांना एकेण्याच भाग्य लाभल आहे.
रत्नागिरीत सावरकरांना भेटायला आलेले डॉ. हेडगेवार, गोधडीबुवा, विठ्ठल रामजी शिंदे, मसुरेकर महाराज, आचार्य अत्रे, डॉ. कुर्तकोटी यांची भाषणं ऐकण्याचा योग ही डॉ. वि. म. शिंदेंना लाभला होता.
तात्यारावांना मांसाहार प्रिय होता. रसिकवृत्ती, उत्तम अत्तराची आवड, दोन रुमाल वापरत, तपकिरीची सवय होती. ख्रिस्तीधर्मात गेलेल्यांना शुध्द करून घेण्याची कामगिरी (श्री. धाक्रस) त्यांनी सहेतुकपणे केली. ख्रिस्ती प्रलोभनाचा विचार करून स्वधर्मातल्या त्रुटी शोधल्या. हिंदू धर्मातल्या गरीब पूर्वास्पृश्यांसाठी शाळा काढली. मुलांना पाटया, पेन्सिली, कपडे दिले जात. ही शाळा डॉ. शिंदे यांच्या अंगणातच भरत असे. अन्य शाळांतही सर्व मुलं सरमिसळ बसविण्यासाठी प्रयत्न केले. धर्मशुध्दी, लिपिशुध्दी अशा असंख्य कामाची सवय रत्नागिरीसारख्या सनातनी नगरीला लागली. बडोद्याच्या साहित्यसंमेलन अध्यक्षपदावरून त्यांनी 'लेखण्या मोडा, बंदुका घ्या' ह्या बहुचर्चित घोषणा दिली. द्रष्टया सावरकरांना सीमासुरक्षिततेचा धोका दिसत होताच.' देशातील तरुणांनी , तरुणींनीही शस्त्रसज्ज असणं गरजेच आहे हे ओळखून तसे प्रशिक्षणही सुरू केलं होत. पटवर्धन हायस्कूल (मुन्सफदळींची व्यायामशाळा) येथे स्वत: सावरकर लाठी, दांडपट्टा मार्गदर्शन करीत होते.
'वक्ता दशसहस्त्रेशु' यांचे एकमेव उदाहरण म्हणजे सावरकर. बंगालमध्ये तरुण स्वातंत्र्यवीराचं भाषण ऐकून एवढे प्रभावित झाले की त्यांनी स्वरक्ताने सह्या करून देशसेवेची शपथ घेतली.
डॉ. शिंदेंच्या वडिलांचा, भावाचा टॉयफाईड मुळे अकाली मृत्यू झाला. डॉक्टरांच्या पत्नीला भेटून नमस्कारासाठी तात्याराव वाकले तो संस्मरणीय क्षण होता. पंचवीस वर्षांच्या काळानंतर सारवकर, रत्नागिरीकरांना भेटले. त्यावेळचा आनंद अवर्णनीय. प्रत्येकाची आस्थेने विचारपूस, कौटुंबिक चौकशी, छंद इत्यादी बद्दल ते बोलले. खुद्द डॉक्टरांचा आणि सावरकरांचा 'सावरकर सदनात' ला संवाद आठवून डॉ. वि.म. मनापासून हसून आपली फजिती म्हणून सांगताना तात्यारावांच्या प्रत्येक प्रश्नावर डॉक्टरांचे उत्तर होत इंग्रजीत. त्यावेळचे त्यांचे (तात्याराव त्वरित मराठीकरण म्हणजे प्रॅक्टिस -व्यवसाय, मेडिकल -वैद्यकीय, लॉ-विधिज्ञ शाखा आठवून आजही डॉक्टरांना गंमत वाटते आणि त्या भाषाप्रभूबद्दलचा आदर दुणावतो.
स्वातंत्र्यवीराचं 'कमला' खंडकाव्य, देशप्रीतीच्या हळुवार रचना, कवितेतील तरलता, चमकदार कल्पनांची आतिषबाजी, 'स्वतंत्रते भगवती' मधली संस्कृत प्रचुर भाषा, पोवाडयातली अग्निप्रखर भाषा, दिमाखदार शवदकळेचं नाटयमय दर्शन हे काव्यगुण पाहून प्रश्न पडतो सावरकर नाटककार कवी, लेखक म्हणून श्रेष्ठच ! पण नि:स्वार्थी राजकीय नेता, द्रष्टा हिंदूपुत्र, गाढा इतिहाससंशोधक लेखक पंडित अनुपम योध्दा, सर्वस्व समर्पणाला सिध्द असा विज्ञाननिष्ठ भारतपुत्र, समाजबांधणी करणारा अद्वितीय सेवक आणि 'धन्योस्मि' न मे किंचित कर्तव्यम् विद्यते'म्हणणारा तृप्त भारतीय नागरिक म्हणून थोर ?
थोर साहित्यिका दुर्भा भागवतांना सावरकरांचे अखंड भारत स्वप्न अपूर्ण राहूनही हेही नसे थोडके मानणारे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व आवडत होतच पण नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचा धनी म्हणून 'सुमलोक ही कल्पना मांडणारे कवी सावरकर फार फार भावले होते.
शतवर्षातून एकदाच असा 'शतपैलू' हिरा दिसतो.
डॉ. वि. म. शिंदेंची 'सावरकर स्मरण यात्रा' ही अशी ऐश्वर्यशालिनी आहे. वक्ता श्रोता दोघांनाही अपार पुण्य देणारी!
  पान 1
Go To Top Of Page